आज गेली २ वर्ष चाललेला ‘मराठा मोर्चा’, भाजपचा निवडणूक जाहीरनामा तथा अनेक समाजधुरीणांचा पाठींबा असलेली ‘मराठा’ समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी अखेर विधेयक पारित होत मान्य झाली. आता मराठा समाजास १६% आरक्षणाचा लाभ मिळेल. या निमित्तानं आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गेली काही वर्ष पक्षिय राजकारणविरहीत आणि लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या विद्यार्थी चळवळीत काम केल्यानं या विषयाचे विविध अंग मला माझ्या कुवतीप्रमाणे समजून घेता आले, तीच आरक्षणाबाबतची माझी धारणा खाली काही कायम विचारल्या जाणाऱ्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतोय. 1. आरक्षण म्हणजे काय? - माझ्या मते आरक्षण म्हणजे समाजप्रवाहाच्या मागे पडलेल्या घटकांना समाजप्रवाहात आणुन त्यांना जीवनमान-शिक्षण-आरोग्य-रोजगार इत्यादींच्या समान संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था म्हणजे आरक्षण. 2. आरक्षण नक्की का हवं? - स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्योत्तर काळ काही अनिष्ट सामाजिक रुढी, चालीरीती यामुळे एक मोठा नागरीकवर्ग समाजप्रवाहाच्या बाहेर सोडला गेला. त्याच्या रोजगाराच्या-शिक्षणाच्या संधी हिरावून घेतल्या गेल्या ज्यामुळे त्यांचे जीवनमान खालावलं, या अन्यायाविरूद्ध राजा राम मोहन रॉय-स्वातंत्र्यवीर सावरकर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महात्मा गांधी-महात्मा फुले-शाहू महाराज यांसारख्या समाज सुधारकांनी जागरण केलं, या अनिष्ट रूढी-चालीरीती मोडायचं काम केलं. - सोबतच खुली अर्थव्यवस्था उत्पन्नाची तुटपुंजी साधनं, त्यावरचे एकाधिकार शिवाय वाढती नफेखोरी यामुंळे एक मोठा वर्ग आर्थिक प्रवाहाच्या बाहेर राहीला, परीणामी त्यांच्या शिक्षणाच्या-जीवनमान सुधाराच्या संधी दूरावल्या. अगदी समाजवाद-साम्यवाद-भांडवलशाहीच-उदारमतवाद-एकात्ममानववाद यांसारख्या विचारप्रणाली त्यांचे विचारवंत तर ज्युडाईझम-इस्लाम-ख्रिश्चॅनीटी सारखे धर्म विविध राष्ट्रं यांनी आपापल्या पद्धतीनं Economic Models मांडत या विषयाला उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण सर्व व्यवस्थांमध्ये आर्थिक दुर्बल घटक आढळतातच. - शिवाय आजही जगभरात लिंगभेद-पुरुषप्रामण्यवादा सारखे भेद आढळतातच. एका मोठ्या समाजघटकाच्या Gender मुळे त्याच्या शिक्षण-रोजगार-जीवनमान(आरोग्य) हे मिळवण्याच्या संधी आणि मुलभूत स्वातंत्र्यावर गदा येताना आपण आजही बघतो. - पण या दुर्लक्षित/वंचित समाजघटकाला पुन्हा समाजप्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी प्रगतीच्या काही अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जेणेकरून तो घटक पुन्हा समाजप्रवाहात एकरूप होण्यासाठी आरक्षण हवंच. 3. आरक्षणाचे निकष तुम्हाला पटतात का? - होय. - समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी पैसा/रोजगार नसल्यामुळे संधी नाकारली जाणं हा अन्याय आहे, त्यामुळे सामाजिक न्यायाचा मानकांप्रमाणे अशा घटकांना आरक्षण हवंच. - सोबत अनेक दशकं शोषणाचा निकष जर ‘जात’ होती तर आता जर कोणा घटकाला ‘जाती’ मुळे संधी नाकारल्या जात असतील तर आरक्षणाचा निकष देखील जात हवा. - जर शोषणाचा-संधी नाकारायचा निकष लिंग/Gender असेल तर आरक्षणाचा निकष देखील लिंग/Gender हवा. - भाषा-उपासनापद्धती-त्वचेचा रंग-खाद्य-संस्कृती यांसारख्या कुठल्या मुद्द्यामुळे भेद निर्माण करत जर संधी नाकारली जात असेल तर त्या निकषावर देखिल आरक्षण हवं. 4. आरक्षणामुळे गुणवत्तेवर परीणाम होतो का? - नाही, Genuine Excellence हा Statistically खुप दुर्मिळ असतो आणि कुठल्याच परिस्थितीत नाकारतां येत नाही. 5. आरक्षण असावं की नसावं? - असावं असलेच पाहीजे. कारण ज्या सामाजिक घटकाची(नागरीकाची) शिक्षणाची-रोजगाराची-जीवनमानाची संधी त्याची भाषा, जाती, उपासनापद्धती किंवा आर्थिक परिस्थिती मुळे दुरावत असेल त्याला समाजप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हवंच. - आरक्षण ही विविधतेने भरलेल्या समाजासाची Social Reality आहे जी टाळतां येणार नाही, ती टाळणं हा मुर्खपणा ठरेल. उद्याचा अनुदीनीमध्ये - 1. भारतीय आरक्षणव्यवस्थेचं failure काय? 2. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावे असं मला वाटतं? 3. जातीनीहाय आरक्षण जातीअंतामध्ये अडथळा आहे का? 4. आरक्षण हा मुलभूत अधिकार असु शकतो का? वरच्या मुद्ंयांवर काही शंका-सुधार-टीका असल्यास कमेंटमध्ये नक्की वाचायला आवडेल. क्रमश: -ईशान गणपुले. (संगमनेर) #LucidAngle
0 Comments
Leave a Reply. |
Archives
January 2019
Categories
All
|